नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी येत्या नववर्षात एक नवा नियम घेऊन येणार आहे. sbi ने सुरक्षेच्या दृष्टीने ‘एटीएम’मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
नवीन वर्षात 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व एटीएममध्ये ही सुविधा लागू होणार आहे. स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ‘ओटीपी’ टाकावा लागणार आहे. बॅंकेत ग्राहकाचा जो संपर्क क्रमांक नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाणार आहे. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यानंतरच ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे.