मुंबई:
एसटी महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून राज्यातील काही आगारांमध्ये ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या अघोषित संपामुळे मुंबई-ठाण्यासह अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
करारानुसार देण्यात येणारी वेतनवाढ ही मागणीपेक्षा कमी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. याबाबत एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकृत कामगार संघटनेने संपाची हाक दिलेली नाही. तरीही कामगारांनी स्वयंस्फूर्तीने काम बंद आंदोलन पुकारल्याची चर्चा आहे. ‘कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस दिलेली नाही’, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. आगाऊ नोटीस दिल्याशिवाय अधिकृतपणे संप पुकारता येत नाही. त्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन काम बंद आंदोलन सुरू केले असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मनमानी विरोधात हा संप पुकारल्याचा संताप एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
काही ठिकाणी संपाचे कारण देत डेपो बंद करण्याचे कामगार संघटनांचे प्रकार सुरु आहेत. परळ स्थानक पहाटे तीन वाजेपर्यंत सुरळीत सुरू होते पण सकाळीच या ठिकाणी दगडफेक करुन वाहतूक थांबविण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल, पनवेल, ठाणे जिल्ह्यातील बस आगारांमध्ये एसटी थांबलेल्या असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.