नवी दिल्ली :- भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्यांमुळे मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. टाइम्स नाऊ आणि वीएमआरच्या सर्वेक्षणानुसार बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर एनडीएला १३ जागांसाठी फायदा होताना दिसतो आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात एनडीएला २७० जागाच मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, हा आकडा वाढून २८३ होण्याची शक्यता आहे.
१४ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी या दिवशी पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे एकीकडे एनडीएच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत असताना, दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या जागांचा आकडा १३५ पर्यंतच थांबला आहे. हवाई हल्ल्यापूर्वी काँग्रेस आणि मित्रपक्षांना १४४ जागा दाखवण्यात आल्या होत्या. हवाई दलाच्या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशात सपा-बसपा आणि राजदच्या महाआघाडीला मोठा झटका बसू शकतो. तर दुसरीकडे एनडीएला उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये फायदा मिळत आहे. एनडीएला सर्वाधिक उत्तर प्रदेशात ३ जागांवर फायदा मिळू शकतो. हल्ल्यापूर्वीच्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात भाजपाला ३९ जागा मिळणतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता आता हा आकडा आता ४२ झाला आहे.