मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय.. ‘या’ तारखेपासून शाळा सुरु होणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना उपस्थितीची कोणतीही सक्ती नसणार, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे लागणार. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्रांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल.

शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सने दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरच विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे. शाळांबाबतचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार असून निवासी शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या 4 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटते बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगले आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.