मुंबई – देशभरात आधीच करोनामुळे होरपळलेल्या सामान्यांना पेट्रोल, डिजेल दरवाढीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र ही झळ सर्वसामान्यांना काही प्रमाणात होता. मात्र आता इंधन दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी इंधन दरवाढीमुळे प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे.
ऑटो- टॅक्सीच्या कमीतकमी भाड्यामध्ये 3 रुपयांची वाढ झाली आहे. रिक्षाचे प्रारंभिक भाडे हे 18 रुपये होते. आता त्यामध्ये 3 रुपयांची वाढ झाल्याने ते 21 रुपये झाले आहे. तर काळ्यापिवळ्या टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये झाले आहे. या भाडेवाढीचे स्वागत मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केले आहे.
कोरोनामुळे एप्रिल ते जूनमध्ये वाहनातून काहीच उत्पन्न मिळाले नव्हते. अनेकजण उधारी आणि कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. भाडे वाढविल्याने काहीतरी आशा निर्माण झाली आहे. मात्र या भाडेवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर जरूर दिसणार आहे.