सहआरोपींना २०-२० वर्षांची शिक्षा ; दोन जणांची निर्दोष मुक्तता ; जोधपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
जोधपूर : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सहआरोपींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दोन जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. पॉक्सो अॅक्टमध्ये झालेल्या बदलानंतर आलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे.
जोधपूर सेंट्रल जेलमध्ये विशेष कोर्टरुम तयार करण्यात आले आहे. जोधपूर एससी-एसटी कोर्टचे जज मधुसूदन शर्मा यांनी जेलमधील कोर्टरुममध्ये हा निर्णय दिला आहे. आसाराम साडेचार वर्षांपासून जोधपूर तुरुंगात कैद आहे. बुधवारी सकाळी कोर्टाने आसारामसह तिघांना दोषी ठरवले आणि दुपारी आसारामला जन्मठेप आणि सहआरोपी शिल्पी व शरदचंद्र यांना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली.
———आसाराम ढसाढसा रडला ——–
कोर्टाने निकाल सुनावल्यानंतर आसाराम कोर्टातच रडला. हरी ओम हरी ओम मंत्राचा जप करत होता. शिक्षा सुनावताच आसाराम डोकं धरुन खाली बसला आणि धाय मोकलून रडू लागला.
न्यायाधीश निकालाचं वाचन करत होते, तेव्हा आसाराम सहआरोपी शरद आणि शिल्पी यांच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता.
आसारामच्या आश्रमाच्या प्रवक्त्या निलम दुबे यांनी म्हटले आहे की या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले जाईल. तिथे न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टाचेही दार ठोठाणार. या शिक्षेमुळे हे सिद्ध झाले की तुम्ही कितीही दिग्गज असले, स्वतःला धार्मिक, अध्यात्मिक गुरु म्हणून घेत असले तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत.
शिक्षा सुनावल्यावर आसाराम म्हणाला- मौज करेंगे
आसारामला लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याने हरिओमचा जप सुरु केल्याचे सूत्रांनी म्हटले होते. दुपारी जेव्हा जज निकालाचे वाचन करत होते आणि जेव्हा आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हा तो म्हणाला, की ‘अब जेल में मौज करेंगे’.
साडेचार वर्षांपासून तुरुंगात असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर तुरुंगात जाण्याचे कोणतेही भय सुरुवातीला दिसले नाही. जेव्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हा मात्र आसारामचे मनोधैर्य खचले, असे सूत्रांनी सांगितले.
आसारामसह तीन जण दोषी
लैंगिक अत्याचार प्रकरणी आसारामला दोषी ठरवण्यात आले असून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यासह शिल्पी उर्फ संचिता गुप्ता, शरदचंद्र ऊर्फ शरतचंद्र दोषी यांना प्रत्येकी 20-20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्याचा सेवादार प्रकाश, शिवा यांना निर्दोष मुक्त केले आहे. शिल्पी ही आसारामच्या आश्रमताली वॉर्डन होती. तर शरद हा त्याचा सेवादार आहे.आसारामने साडेचार वर्षांत जवळपास डझनभर जामीन याचिका दाखल केल्या मात्र त्याला जामीन मिळाला नाही. दुसरीकडे, या प्रकरणातील सहआरोपी आणि त्याचा सेवादार प्रकाश याने जामीन घेतला नाही, तो जेलमध्ये आसारामची सेवा करत असल्याची माहिती होती.
निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करु शकणार
पॉक्सो अॅक्ट अंतर्गत स्थापन करण्यात आलेले कोर्ट हे जिल्हा सत्र न्यायालयाच्या स्तरावरील असते. या कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर थेट हायकोर्टात अपील करता येणार आहे.
चार राज्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त
या निकालामुळे आज राजस्थान, गुजरात, हरयाणा व उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आसारामची भक्तमंडळी व अनुयायी या चार राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
2013 मध्ये जोधपूर जवळील आसारामच्या आश्रमात एका उत्तर प्रदेशातील 16 वर्षीय मुलीवर बलात्कार व अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जोधपूर विशेष न्यायालय मध्यवर्ती कारागृहाच्या भागातच हा निकाल जाहीर केला गेला.
—————-आम्हाला न्याय मिळाला
आसाराम दोषी ठरल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. आता त्याला कडक शिक्षा होईल अशी आम्हाला आशा आहे. या शिक्षेद्वारे या प्रकरणातील ज्या साक्षीदारांची हत्या झाली तसेच जे बेपत्ता आहेत त्यांना न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.
आसारामला कठोरात कठोर शिक्षा, कारण…
* पॉक्सो अॅक्टमध्ये 2012 मध्ये अल्पवयीनचे वय 16 वरुन 18 करण्यात आले. पीडिता 17 वर्षांची होती.
* द क्रिमिनल लॉ अमेंडमेंटमध्ये 2013 मध्ये दुष्कर्माची व्याख्या बदलण्यात आली. त्यामुळे कलम 376 लावण्यात आले.
*आसारामवर दाखल गुन्ह्यात अशी कलमे लावण्यात आली होती, ज्यामुळे कमीत कमी 10 वर्षे शिक्षा आणि या कलमांमध्ये जन्मठेपेचीही तरतूद आहे. त्यानुसार आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
*जोधपूर कोर्टाचा निकाल आल्यानंतर, शक्यता आहे की आसारामला गुजरात जेलमध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे. तेथील केसचे ट्रायल पेंडिंग असल्यामुळे आसाराम तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता कमी आहे.
पाकिस्तानातून आला होता आसाराम
आसाराम याचा जन्म 17 एप्रिल 1941 मध्ये बिरानी नावाच्या गावात झाला होता. हे गाव आता पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर आसारामचे कुटुंब भारतात आले. त्यानंतर ते, या शहरातून त्या शहरात फिरत होते. – वडिलांच्या मृत्यूनंतर आसारामने चहाच्या हॉटेलवर काम केले. याच दरम्यान त्याने शिक्षण सोडले. वयाच्या 15व्या वर्षी आसाराम घरातून पळून जाऊन आश्रमात राहु लागला. त्यानंतर त्याची समजूत काढुन कुटुंबियांनी घरी आणले आणि लग्न करुन दिले. आसारामच्या पत्नीचे नाव लक्ष्मी आहे. त्याला दोन मुले आहेत, मुलगा नारायण साई आणि मुलगी भारती.
आसाराम कसा झाला?
१९४७ नंतर आसाराम भारतात आला. त्यानंतर अहमदाबाद येथे राहत होता. १९६०च्या दशकात लीलाशाह त्याने आपला आध्यात्मिक गुरु बनविले. लीलाशाह यांने असुमल हरपलानीचे नाव आसाराम ठेवले. प्रवचन केल्यानंतर मोफत जेवण देवून त्यांने आपला भक्तगण वाढवला. या त्याच्या वागण्याने त्याचा मोठा भक्तगण वाढीला लागला. आसारामचे संकेतस्थळ (वेबसाइट) असून त्याचे चार कोटी भक्तगण आहेत.
४०० आश्रमांचे साम्राज्य उभे केले
आसारामचे भक्तगण जगात आहेत. आसारामचा मुलगा नारायण साई याने भारतात नाही तर परदेशात ४०० आश्रमांचे नेटवर्क उभे केले. त्याची संपत्ती १० हजार कोटी रुपयांची आहे. या संपत्तीची चौकशी सुरु आहे. आश्रम तयार करताना जमीन हडपली गेली आहे. आसारामचे वागणे ह राजकीयनेत्याप्रमाणे आहे. त्याने त्यासाठी काही राजकीय नेत्यांचा वापरही केला. कारण आसाराम याचा भक्तगण मोठा असल्याने राजकीय नेत्यांनी त्याला महत्व दिले. १९९० ते २००० दरम्यान, भक्तांच्या यादीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. तसेच दिग्विजय सिंग, कमलनाथ, मोतीलाल व्होरा आदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांची नावे या यादीत आहे. तसेच भाजपाचे विद्यमान आणि माजी नेतेही यांचाही समावेश आहे. शिवराज सिंग चौहान, उमा भारती, रमन सिंग, प्रेम कुमार धूमल, वसुंधरा राजे आदी मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे.
-१६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार,
साक्षीदारांची हत्या आणि आसाराम बापू
बलात्कार प्रकरणात २०१४ पासून न्यायालयात सुनावणी सुरु झाली. मात्र, सुनावणी सुरु होताच आसारामबापूच्या समर्थकांनी साक्षीदारांना लक्ष्य करायला सुरुवात केली.१६ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराप्रकरणी पोलिसांनी ९ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले.
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूविरोधात जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. २०१३ मध्ये जोधपूरमधील आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवले. निकालाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा, राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांमधील पोलिसांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, हे प्रकरण नेमके काय आणि गेल्या पाच वर्षांत आसाराम बापू हा स्वयंघोषित गुरु खलनायक कसा ठरला याचा घेतलेला हा आढावा….
बलात्काराचे प्रकरण काय?
उत्तर प्रदेशमधील मुलीने २०१३ मध्ये आसारामबापूविरोधात बलात्काराची तक्रार दिली. उत्तरप्रदेशमधील शहाजहाँपूरमधील पीडित मुलगी शाळेत भोवळ येऊन पडली होती. यानंतर तिला आसारामबापूच्या आश्रमात नेण्यात आले. तिच्यावर काळी जादू झाली असून तिला काही दिवस आश्रमात ठेवावे, असे तिच्या पालकांना सांगण्यात आले. १५ ऑगस्ट २०१३ रोजी आसाराम बापूने आश्रमात बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला होता.
आसारामला अटक
बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या आठवडाभरानंतर आसारामबापूला अटक करण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामबापूला अटक होईपर्यंत आमरण उपोषण केले होते. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरल्याने आसारामबापूच्या अटकेसाठी दबाव वाढत होता. अखेर ३१ ऑगस्ट रोजी इंदूरजवळील छिंदवाडा येथील आश्रमात जोधपूर पोलिसांचे पथक पोहोचले. मात्र, आसारामच्या समर्थकांनी आश्रमाबाहेरच पोलिसांना रोखून ठेवले. आसाराम बापूची प्रकृती चांगली नसल्याचे कारणही पोलिसांना देण्यात आले. जवळपास आठ तास पोलिसांना आश्रम परिसरात ताटकळत ठेवण्यात आले होते. पोलिसांनी इंदूरमधील वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल दिल्याने आसारामबापूच्या समर्थकांचा नाईलाज झाला. अखेर मध्यरात्री उशिरा आसारामबापूला अटक करण्यात आली. यानंतर १ सप्टेंबर रोजी आसारामबापूला विमानाने दिल्ली मार्गे जोधपूरला नेण्यात आले. आसारामबापूच्या अटकेनंतर त्याच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने आणि रेलरोकोच्या माध्यमातून थयथयाट केला होता.