जळगाव : मुंबई येथे उपचारासाठी गेलेल्या आईवर शस्त्रक्रिया होऊ न शकल्याने वडील आईला घेऊन माघारी फिरल्याच्या नैराश्यातून एका १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. कोमल सुनील भालेराव (१९) असे या तरुणीचे नाव असून याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेले कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहणारे सुनील गोरख भालेराव यांची पत्नी सुनंदा यांना कानाचा आजार होता, त्यावर उपचार व शस्त्रक्रीया करण्यासाठी दाम्पत्य मुंबईला गेले होते. घरी मुलगी कोमल व भाऊ शुभम असे दोघंच होते. आईची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही असे तिला तिच्या वडीलांनी सायंकाळी फोन करुन कळविले. कोमल ही याच गोष्टीमुळे नैराश्यात आली व घरात वरच्या मजल्यावर साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा भाऊ शुभम हा जीमला गेला होता.
तेथून रात्री ८ वाजता परत आला असता दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही कोमल प्रतिसाद देत नसल्याने शुभम याने खिडकीतून डोकावून पाहिले असता तिने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने घरमालक किरण यादव तळेले यांना हा प्रकार सांगितला. यादव यांनी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, हवालदार प्रमोद पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व दरवाजात तोडून कोमल हिला शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.