अनिल देशमुखांच्या संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाचा छापा; तब्बल 16 तास झाडाझडती

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होतांना दिसून येत आहेत. देशमुखांच्या  नागपुरातील सिविल लाईन्स भागात असलेल्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी सुरू झालेली कारवाई शनिवारी पहाटे तीन वाजता संपली. आज शनिवारी अनिल देशमुख ज्या साई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेच्या नागपुरातील रामदासपेठ परिसरात असलेल्या मिडास हाईट्स या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आयकर वीभागाचे अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करत असल्याचे दिसून आहे. साई शिक्षण संस्थेवर कालपासून सुरू असलेली ही कारवाई सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे..

यावेळी कार्यालयाबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून आत कार्यालयात कागदपत्रांत आणि अन्य दस्तावेज पडताळणी आयकर अधिकारी करत असल्याचे दिसून आले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संबधीत ठिकाणांवर दोन दिवसांपासून आयकर विभागाची सुरू असलेली कारवाई कधी संपते आणि आयकर विभागाच्या हाती  काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले आहेत त्या प्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली आहे. आता आयकर विभागाने छापेमारी केली आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली. मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रूपये दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आरोप केला होता. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा अनिल देशमुख यांना द्यावा लागला होत.

सचिन वाझेचं अँटेलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण या सगळ्या घडामोडंच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं होतं. जे अत्यंत वादळी ठरलं होतं. या अधिवेशनातच अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले होते आणि एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांना पद सोडावं लागलं.

आधी ईडीची चौकशी, त्यानंतर सीबीआयची चौकशी आणि आता आयकर विभाग अशा तिन्ही यंत्रणांकडून अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात येते आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार हे सरळ आहे. एवढंच नाही तर ईडी आता अनिल देशमुख यांना समन्स बजावूनही ते कोर्टात हजर राहात नाहीत म्हणून कोर्टातही गेली आहे. आता अनिल देशमुख प्रकरणात पुढे काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.