नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतील साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीवर अभिषेक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी भाविकांच्या देणगीतून घडविण्यात आलेल्या 25 किलो चांदीच्या मूर्तीवर आता यापुढे अभिषेक करण्यात येणार आहे.
श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मूळ देवी मूर्तीवरील सुमारे 2 हजार किलो शेंदूर काढण्यात आल्याने अलिकडेच देवीचे मूळ रूप समोर आले आहे. त्याचे संवर्धन व्हावे यासाठी मूळ देवीच्या मूर्तीला अभिषेक करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. गडावर उद्या पासून म्हणजे 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यँत खासगी वाहनांच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. तसे आदेश नाशिकचे उपनिवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी काढले आहेत.