जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वतीने जैन धर्मावर आधारित ‘तीर्थंकर महावीर जैन मुनी आणि जळगाव’ या सुमारे मागील शंभर वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित पुस्तिकेची निर्मिती करण्यात येत आहे. हा गेल्या शंभर वर्षाचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लोकशाहीने विडा उचलला असून या उपक्रमाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीच्या कार्यालयात करण्यात आले.
यावेळी पुष्पाजी बनवट, शशीजी बाफना, शशीजी कटारिया, ताराबाई रेदासनी, ताराबाई डाकलिया, मनीष लुंकड, महेंद्र सिना, दिलीप गांधी, अनिल कांकरिया, स्वरूप लुंकड, प्रदीप मुथा, प्रसन्न रेदासनी, प्रवीण पगारिया, देवांग दोषी, ललित लोढाया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल कांकरिया यांनी सांगितले की, भारतात प्रथमच देशभरातील सर्व जैन नागरिकांसाठी ‘तीर्थंकर महावीर जैन मुनी आणि जळगाव’ हे पुस्तक उपयुक्त राहणार असून या अभ्यासपूर्ण पुस्तिकेचा सर्वांना उपयोग होणार आहे. गेल्या शंभर वर्षाचा घेतला जाणारा आढावा हा पुढच्या शंभर वर्षांसाठी अनेक पिढ्यांना फायदेशीर आणि मार्गदर्शक ठरणार असून देशभरातील सर्व जैन धर्मियांसाठी आणि जळगावसाठी हा अमूल्य असा आणि मानाचा ठेवा राहणार आहे.
उद्योगपती स्वरूप लुंकड म्हणाले, आजवर कुणाच्याही विशेष लक्षात न आलेली अनोखी अशी ही ‘तीर्थंकर महावीर जैन मुनी आणि जळगाव’ या पुस्तिकेची संकल्पना आहे. यामुळे गेल्या शंभर वर्षाची जळगाव शहराची जैन धर्मा संदर्भातली माहिती विशेषत्वाने उपलब्ध होणार आहे. प्रत्येक टेबलवर ही कॉफी टेबल पुस्तिका आग्रहाने ठेवावी अशी ही पुस्तिका राहील.
जैनेतर असताना सुद्धा लोकशाही समूहाने या उपक्रमाला प्राधान्य दिल्याबद्दल लोकशाहीचे विशेष आभार प्रवीण पागरिया यांनी आपल्या मनोगतातून मानले. तसेच ही पुस्तिका फक्त धर्म कार्यावर आधारित न राहता सर्वव्यापी होण्याची अपेक्षा पगरिया यांनी व्यक्त केली. पुढच्या शंभर वर्षासाठी ही अनमोल माहिती एक ठेवा म्हणून राहणार असल्याचे दिलीप गांधी यांनी सांगितले. नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केल्यास कमी वेळात हे एतीहसिक पुस्तिका तयार होऊ शकते असा विश्वास डॉ. प्रसन्न रेदासानी यांनी यावेळी दिला.
दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. जैन धर्मासाठी लोकशाहीने पुस्तिका तयार करणे ही जळगाव शहर तसेच जैन धर्मासाठी विशेष अशी बाब असल्याचे मत सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगता द्वारे व्यक्त केले. या उपक्रमासाठी आवश्यक ती सर्व मदत वेळोवेळी करण्याचे आश्वासन देखील यावेळी उपस्थितांकडून देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आले.
लोकशाही समूहाच्या माध्यमातून ‘तीर्थंकर महावीर जैन मुनी आणि जळगाव’ या ऐतिहासिक माहिती पुस्तिकेचा ठेवा तयार करण्यात येणार असून यामध्ये जैन धर्माच्या सर्व पंथाची गेल्या शंभर वर्षात झालेल्या घडामोडी तसेच जैन मुनी, जैन मंदिरे, दीक्षा घेतलेले मुनी, संथारा घेतलेले महात्मा, जैन धर्माच्या उत्थानासाठी प्रयत्न करणारे व्यक्ती तसेच संस्था अशा अनेक बाबींचा अंतर्भाव होणार आहे. या पुस्तिकेची आठ भागांमध्ये विभागणी करून त्यात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावेळी उपक्रमाचे सल्लागार संपादक धों. ज. गुरव यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर या उपक्रमाचे प्रमुख सुरेश उज्जैनवाल यांनी पुस्तके मागचा हेतू स्पष्ट केला. तर उपक्रमाचे संचालक राजेश यावलकर यांनी या पुस्तिकेसंदर्भात रूपरेषा स्पष्ट करून त्याचे स्वरूप स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सोनवणे यांनी तर आभार जागृती भावसार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव पाटील, मुबारक तडवी, कविता ठाकरे, राहुल पवार आदींनी सहकार्य केले.