जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट होते. मात्र अवकाळी पावसानंतर पारा पुन्हा ४० अंशावर गेला आहे. चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन हवामान कोरडे झाले आहे. तसेच राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचा वेग वाढू लागल्याने जळगाव शहराच्या पाऱ्याने पुन्हा चाळीशी ओलाडली असून मंगळवारी किमान तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे जळगावकरांना ‘मे हिट’ ची अनुभूती आली.
जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस होत असतो. मात्र या दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरीच्या ४८९ टक्के पाऊस झालेला आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस जळगाव जिल्ह्यात यंदा झालेला आहे. दि.६ मे नंतर तापमानाचा पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. या आठवड्यात राजस्थानमार्गे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा वेग वाढत आहे. एकीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्राकडे अँटी सायक्लोनची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गुजरात, राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचे प्रमाण वाढणार असून दि.१० ते १६ मे दरम्यान जळगाव जिल्ह्याचे तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हिट पुन्हा वाढणार
राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचा दिवसेंदिवस वेग वाढल्यास पारा दि. १० ते १३ मेदरम्यान किमान तापमान ४४ अशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आगामी आठवडाभर तापमानाचा पारा दिवसागणिक वाढणार असून जळगावचा पारा ४४ ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आठ दिवस ‘मे हिट’ची लाट येणार असल्याने दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर न पडण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकयांनी दिला आहे.
वेदर वेलनेसचा अंदाज
वेदरवेलनेस कडून आज जळगावसह भुसावळ, अमळनेर, एरंडोल, फैजपूर, जाम् नेर, वरणगाव व यावल येथे ४५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. रात्री ८ वाजेनंतर पारा ४० अंशाखाली येईल तसेच १४ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज वेदरवेलनेसचे निलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे.