जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथुन जवळच असलेल्या सावखेडा निमगव्हाण तापी नदीच्या पुलावर मोठ-मोठे जिवघेणे खड्डे पडले. त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहने नेताना अडचणीचा सामना करावा लागत असून वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परिणामी अपघात होण्याची संभावना असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यमार्ग क्रं.14 चोपडा अमळनेर रस्त्यावर सावखेडा – निमगव्हाण तापी नदीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यावर पाणीच-पाणी साचलेले आहे. तापी पुलावर मोठे- मोठे जिवघेणे खड्डे पडल्याने वाहने चालवण्यासाठी खड्डे टाळतांना फारच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहनांची अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी पुलावरील जिवघेणे खड्डे तात्काळ बुजून पुलावरील साचलेल्या पाण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करण्याची मागणी त्रस्त प्रवासी व वाहनधारकांकडुन केली जात आहे.