चेन्नई;- तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. येथील एका फटाका कारखान्याच्या गोदामात स्फोट झाला. यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 10 लाखांचा माल जळून खाक झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
स्फोटामुळे परिसरातील काही दुकाने आणि घरांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. मौल्यवान जीवितहानी झाली. या कठीण प्रसंगी माझे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत.