मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत. भारतात (India) कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जास्त. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा (Summer Season) उन्हाच्या झळाही अधिक तीव्र असणार आहेत. देशातील दक्षिण भाग तसेच मध्य भारत, उत्तरेकडील प्रदेश आणि पूर्व भारतामध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज ( IMD ) भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवलेला आहे.
दरम्यान हंगामाच्या सुरवातीला (Temperature) उष्णता ही सामान्य असली तरी मार्च, एप्रिल आणि मे मध्ये उन्हाच्या कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तवलेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाचा उन्हाळा नसून ऊन आणि उकाड्याला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
उन्हाळाच्या ऐन मध्यावर हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि लगतच्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशात आणि पूर्व अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागामध्ये दरवर्षीपेक्षा अधिकचे तापमान राहणार आहे. तर उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडू येथे सर्वसाधारण तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिना संपला की उन्हाळाची चाहूल लागते. मात्र देशात खरा उन्हाळा मार्चपासूनच सुरु होतो तो जूनच्या मध्यापर्यंत किंवा पावसाला सुरवात होईपर्यंत कायम असतो. मार्च महिन्यात उन्हाळा सुरु होताना दक्षिण ओडिशा आणि मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उष्ण वातावरण राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि किनारपट्टीच्या महाराष्ट्रात उबदार रात्रीमुळे मार्चमहिन्यात लक्षणीय उष्णता असेल असे आयएमडीच्या प्रमुखांनी सांगितले आहे. केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि किनारपट्टीच्या महाराष्ट्रात रात्रीच्या उकाड्यात वाढ होईल तर मार्च महिन्यात लक्षणीय उष्णता वाढेल. मार्च महिन्यात भारतात फारसा पाऊस पडत नाही आणि या महिन्यात देशभरातील एकूण पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भर उन्हाळ्यात पश्चिम, मध्य आणि वायव्य भागामध्ये उष्णतेची लाट येणार आहे. या तुलनेत गंगेच्या मैदानी प्रदेशात उष्णतेची लाट तुलनेने कमी राहणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये पूर्व, ईशान्य, वायव्य आणि पश्चिम भारतामध्ये रात्रीच्या उकाड्यात वाढ होणार आहे तर दक्षिण भारतामध्ये मे महिन्यापर्यंत रात्रीचा गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.