जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
विद्यापीठांतर्गत येणाऱ्या स्वायत्त महाविद्यालयांनी विविध योजना बंद केल्यामुळे आणि फी वाढ केल्याने अनेक आर्थिक दुर्बल व ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना, जळगावतर्फे क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी रजिस्टार किशोर पवार यांना विविध आशयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त महाविद्यालयांनी बंद केलेली कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका योजना, आर्थिक दुर्बल घटक विकास योजना या योजना पूर्ववत कराव्या, विद्यापीठाने स्वायत्त महाविद्यालयांना तसे आदेश द्यावेत, तसेच विद्यापीठाचे शुल्क परिपत्रक क्रमांक 30/2022 यानुसार विद्यापीठाने दुपटीने केलेली फी वाढ त्वरित मागे घ्यावी. या मागण्या सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत.
या दोन्हीही मागण्या अत्यंत संवेदनशील असताना विद्यापीठ प्रशासन याकडे डोळेझाकपणा करत आहे. कुलगुरूंना निवेदन द्यायला गेल्यास ते निवेदन स्वीकारत नाहीत. अशी तक्रार विद्यार्थ्यांनी यावेळेला केली. म्हणून दहा दिवसांमध्ये विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर विद्यापीठ प्रशासना विरोधात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सत्यशोधक विद्यार्थी संघटना तसेच शहरातील इतर विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
निवेदन देण्याप्रसंगी, अविनाश तायडे, नेहा पवार, आरिफ तडवी, वैशाली कोळी, चंचल धांडे, आर्यन भोईटे, सुष्मिता भालेराव आणि अजय पाटील हे उपस्थित होते.