नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
‘मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे. शाळा, कॉलेज, कार्यालये आणि इतर संस्था कार्यरत होत आहेत. मणिपूरच्या आगीत तेल ओतणाऱ्यांना एका वेळी मणिपूरच नाकारेल,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरापासून हिंसाचारग्रस्त असलेल्या मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी आपले संसदीय मौन सोडत भाष्य केले. दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलण्याची संधी नाकारल्याने संतप्त विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी आपल्या दीड तासाच्या भाषणात ‘नीट’, मणिपूरमधील पेच, राज्यघटना, काँग्रेस, पश्चिम बंगाल, रोजगार, भ्रष्टाचार, सीबीआय, ईडी, संघराज्यरचना, आणीबाणी, जम्मू-काश्मीर, दलित आदी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘देशातील तरुणांना मी खात्री देतो की, तुमची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठीच एकापाठोपाठ एक कारवाई होत आहे,’ असे त्यांनी ‘नीट’प्रश्नी नमूद केले. जवळपास 32 मिनिटे भाषण केल्यावर त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे टीकेचा रोख वळवला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सभात्याग केला. त्यावर ‘ऑटो पायलट आणि रिमोट पायलटवर सरकार चालवण्याची सवय असलेले लोक काम करण्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर्क संपले की, आरडाओरडा करतात किंवा मैदानातून पळ काढतात,’ असा हल्लाबोलही मोदी यांनी केला.
आज ईशान्य भारत पूर्व आशियाशी व्यापाराचे प्रवेशद्वार बनत आहे. या राज्यांत नव्वदच्या दशकात दहा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. हा इतिहास समजून घेऊन परिस्थिती सुधारायची आहे. मतपेढी नसल्याने त्यांनी वर्षानुवर्षे ईशान्येला त्यांच्या नशिबावर सोडले आहे. ईशान्येत जे काम आम्ही पाच वर्षांत केले, ते करण्यास काँग्रेसला 20 वर्षे लागली असती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत नमूद केले.
मुलायमसिंह यादव म्हणाले होते की, काँग्रेसशी लढणे सोपे नाही. ते तुम्हाला तुरुंगात टाकतील. नेताजी खोटे बोलत होते का, हे मला रामगोपाल यादव यांना विचारायचे आहे. त्यांनी कृपया आपल्या पुतण्याला (अखिलेश) हेही लक्षात आणून द्यावे, की राजकारणात येताच सीबीआय त्यांच्याही मागे लागली होती. सीबीआय हा पिंजऱ्यात बंदिस्त पोपट आहे, जो मालकाच्या आवाजात बोलतो, असे यूपीए सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
रमेश यांना लगावला टोला
काँग्रेसमधील एकजण निकाल आले, तेव्हापासून एकटाच झेंडा घेऊन धावत आहे. आम्हाला 10 वर्षे झाली आणि अजून 20 वर्षे बाकी आहेत. एक तृतीयांश कार्यकाळ पूर्ण झाला आणि दोन तृतीयांश बाकी आहे. म्हणूनच त्याच्या तोंडात तूपसाखर पडो, असा टोला मोदी यांनी जयराम रमेश यांना लगावला.