नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच मोदींनी पंतप्रधान म्हणून शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर आता देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणार आहेत.
मान्सूनचे आगमन झाले असून पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू असतानाच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे. मोदी यांच्या या निर्णयानंतर पुढच्या काही दिवसांतच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जाणार आहेत.
17 व्या हफ्त्याला मंजुरी
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात होते. दरम्यान नव्या सरकारची स्थापना होताच 17 वा हफ्ता मंजूर करण्यात आला आहे. आता पुढच्या काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार असून पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशांची मदत होणार आहे.
मोदी यांनी या योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी दिल्यामुळे साधारण 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2000 रुपये येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना एकूण 20 हजार कोटी रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा 16 वा हफ्ता आला होता.