लोकशाही न्यूज नेटवर्क
एका आर्थिक वर्षामध्ये दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान निधी म्हणून देण्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. चोपडा तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या वीस दिवसांपासून पीएम किसान साईट बंद असल्याने हैराण झालेले आहेत.
ऑनलाईन कामकाज पूर्णपणे ठप्प पडले आहे. याबाबत प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. काही मयत शेतकऱ्यांचे वारसदार तसेच काहींनी बऱ्याच वेळेस बँक खाते चेक करून देखील त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नसल्याची तोंडी तक्रार लोकशाहीकडे केली आहे. आडगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील त्याचबरोबर अरुणाबाई पाटील हे शेतकरी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चोपडा तहसील परिसरात असणाऱ्या सेतू सुविधा केंद्रांवर पायपीट करीत आहेत.
याबाबत प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर पीएम किसान साईट पूर्ववत करून लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत योजनेच्या लाभ पोहोचवावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.