लोकशाही विशेष लेख
कामगार चळवळीचे प्रणेते तथा थोर कवी नारायण सुर्वे हे सर्वांनाच सुपरिचित असे आहेत. साहित्य क्षेत्रातलं हे सुवर्ण नाव. कवी नारायण सुर्वे यांच्या कविता या कामगार चळवळीसाठी प्रचंड प्रेरक अशा ठरल्या होत्या. त्यांची ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे’ ही कविता कामगारांच्या नसानसात आजही झिरपलेली दिसून येते. आपल्या कवितांमधून नारायण सुर्वेंनी तब्बल चार दशके कामगारांच्या जीवनाचा आलेख आपल्या लेखणीतून स्पष्टपणे मांडला. नारायण सुर्वे यांचे नाव मराठी सारस्वतांच्या मालिकेत प्रथम स्थानी म्हटलं जातं. असाच त्यांचा एक गाजलेला कवितासंग्रह म्हणजे ‘जाहीरनामा’. त्यांच्या या जाहीरनामा कवितासंग्रहातील ‘शिगवाला’ या कवितेला घेऊन चक्क नाट्यसंस्थेच्या सेन्सर बोर्डाने नवा वाद निर्माण केला आहे.
नारायण सुर्वे (Narayan Surve) यांच्या ‘शिगवाला’ या कवितेचा आधार घेऊन नाटककार विजय गायकवाड यांनी ‘कशाला मागे सरायचं’ या नाटकाची निर्मिती केली. वास्तविक ‘शिकवला’ या कवितेत कामगारांचे भावविश्व उलगडण्याची शक्ती एकवटलेली दिसते. या कवितेच्या आधारावर नाटककार विजय गायकवाड यांनी नाट्यनिर्मिती केली खरी, मात्र हे नाटक जेव्हा सेन्सर बोर्डासाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे गेले, तेव्हा तिथल्या मंडळीं मधल्या एका सदस्याने नाटकातील ‘सुर्वेंच्या कवितेमध्ये असलेल्या काही ओळी जातिवादक’ असल्याचं अजब कारण सांगत त्या वगळण्यास सांगितलं. नेमका हा विषय काय असेल याची आता साहित्य आणि नाट्य क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे.
कविवर्य नारायण सुर्वे यांना केंद्र सरकारने पद्मश्री (Padmashri) या पुरस्काराने सन्मानित केला आहे. त्यांच्या कवितांमध्ये असलेलं वास्तव पाहता त्यांच्या इतर भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. त्यांच्याच एका ‘शिगवाला’ या कवितेला घेऊन विजय गायकवाड यांनी नाट्यनिर्मिती केली, मात्र सेन्सर बोर्डाला ते काही पटलं नाही. यावर विजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, “हे शब्द माझे नसून कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘जाहीरनामा’ या कविता संग्रहातील ‘शिगवाला’ या कविते मधले आहेत. त्यामुळे मला माझ्या नाटकात या कवितेचा वापर करण्याची परवानगी द्यावी” असे त्यांनी यात सांगितले आहे.
या संदर्भात रंगभूमी पर निरीक्षण मंडळाचे अधीक्षक दिलीप वाघमारे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “सध्याच्या काळात कोणत्याही जातीवाशक शब्दांचा उल्लेख करण्यास मनाई आहे. त्यामुळे कवितेतील काही जातीवाचक शब्द वगळण्यास लेखकाला सांगितले आहे. लवकरच लेखकाला बैठकीसाठी बोलावून त्यावर मार्ग काढला जाईल” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
‘शिगवाला’ या कवितेमध्ये असलेल्या ओळी व शब्दांवर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने आक्षेप घेतला. या ओळींमध्ये जातिवाचक शब्दांचा वापर करण्यात असल्याचा आरोप मंडळांनी केला. त्यामुळे या कवितेतील काही ओळी वगळून नाटक सादर करण्याची सूचना लेखक विजय गायकवाड यांना देण्यात आली आहे. मात्र रंगभूमी पर निरीक्षण मंडळाच्या या कृतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कविवर्य नारायण सुर्वे यांची पूर्ण कविता
शिगवाला
‘क्या लिखतो रे पोरा!’
‘नाही चाचा – – काही हर्फ जुळवतो.’
म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो
गोंडेवली तुर्की टोपी काढून
गळ्याखालचा घाम पुसून तो ‘बीचबंद’ पितो
खाली बसतो;
दंडा त्याचा तंगड्या पसरून उताणा होतो.
‘एक ध्यानामदी ठेव बेटा!
सबद लिखना बडा सोपा है
सब्दासाठी जीना मुश्कील है.’
देख ये मेरा पाय
साक्षीको तेरी आई काशीबाय
‘मी खाटीक आहे बेटा – मगर
गाभणवाली गाय कभी नही काटते.’
तो – सौराज आला; गांधीवाला।
रहम फरमाया अल्ला।
खूप जुलूस मनवला चालवालोने
तेरे बापूने –
तेरा बापू; चालका भोंपू।
हां; तर मी सांगत होता;
एक दिवस मी बसला होता कासाईबाडेपर
बकरा फाडून रख्खा होता सीगपर
इतक्यामंदी समोर झली बोम
मी धावला; देखा –
गर्दीने घेरा था; तुझ्या अम्मीला
काटो बोला
अल्ला हू अकबरवाला
खबरदार; मै बोला
सब हसले, बोले,
ये तो साला निकला पक्का हिंदूवाला
“फिर; काफिरको काटो!”
अल्लाहुवाला आवाज आला
झगडा झाला।
सालोने खूब पिटवला मला
मरते मरते पाय गमवला।
सच की नाय काशिबाय – ?
‘तो बेटे –
आता आदमी झाला सस्ता – बकरा म्हाग झाला
जिंदगीमध्ये पोरा, पुरा अंधेर आला,
आनि सब्दाला;
जगवेल असा कोन हाये दिलवाला
सबको पैसेने खा डाला।’