ब्रेकिंग..अखेर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

0

जालना, लोकशाही न्युज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांची समजूत काढली. अर्धा तास त्या दोघांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण सोडलं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 30 दिवसांचा वेळ देत असून 31 व्या दिवशी सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी त्यांची मागणी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस होता. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्यात आले.

 

मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केलं.

यांची उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, अतूल सावेही होते. तर उपोषण स्थळी मंत्री संदीपान भुमरे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर आधीच पोहोचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालच अंतरवाली सराटीत येणार होते. पण काल त्यांचा दौरा अचानक रद्द झाला.

मात्र रात्री गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी जालन्यात येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शेड्यूलमध्ये नसतानाही मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी जालन्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सकाळी पावणे अकराच्या सुमारास जालन्यात पोहोचले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली.

मनोज जरांगे यांच्या मागण्या

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं. सक्तीच्या रजेवर पाठवणं हा त्यावरचा उपाय नाही. तसेच ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर ते अडून होते. त्यामुळेच त्यांचे उपोषण लांबले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.