महाराणा प्रताप जयंती विशेष
मेवाडचे महाराणा प्रतापसिंह हे नाव जगप्रसिद्ध आहे. मेवाडच्या सिंहाने अकबरासारख्या बलाढ्य बादशहाशी, मेवाड आणि राजपुताना यांच्या स्वातंत्र्यासाठी २५ वर्षे तहान-भूक विसरून लढा दिला. मेवाडचे स्वतंत्र टिकवण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाला इतिहासात कुठेही तोड नाही. प्रतापसिंहाच्या तेजाने केवळ राजपुतानाच नव्हे तर संपूर्ण भारत प्रभावित झाला होता. त्यामुळेच प्रतापसिंहांना संपूर्ण भारतात पूज्य मानल्या जाते. भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंह यांना आजही मोलाचे स्थान आहे. कारण महाराणा प्रताप यांच्या नावानेच त्याकाळी मुगल घाबरत असे. त्यामुळेच भारत भुमिला महाराणा प्रतापसिंहांचा मोठा अभिमान आहे.
महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० साली उत्तर दक्षिण भारतातील मेवाड येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव राणा उदयसिंह. मेवाड, बुंदेलखंड आणि सिरोही वंशातील काही राजे आपला स्वाभिमान, धर्म आणि स्वतंत्रता टिकवून ठेवण्यासाठी अकबराशी प्राणपणाने लढले. पुढे उदयसिंह मेवाडचे राजा झाले. चित्तोडच्या युद्धानंतर चार वर्षांनी दिनांक ३ मार्च १५७२ ला उदयसिंहांचे निधन झाले. यानंतर मेवाडचे संपूर्ण सुत्रे महाराणा प्रतापसिंह यांच्याकडे आले व त्यांचा राज्याभिषेक झाला. ज्यांचे नाव घेतल्याने सर्वांनाच स्फुर्ती येते असे महान तेजस्वी योध्दा म्हणजे महाराणा प्रताप.
महाराणा प्रतापांनी प्रतिकुल परिस्थितीतही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेवाडचे रक्षण केले. जयपूरचा राजा मानसिंग याने अकबरापासुन आपल्या राज्याला धोका पोहोचू नये म्हणून आपली बहीण अकबराला देऊन सोयरिक केली. अकबराने मेवाडला आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी मानसिंहाला मेवाडला जाण्यास सांगितले. त्या निमित्ताने मानसिंग दिल्लीला जात असताना वाटेत मुद्दाम आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरिता कुंभगडावर असलेल्या महाराणा प्रतापसिंह यांच्या भेटीस गेला. महाराणा प्रताप यांनी त्यांचा आदर-सत्कार केला. परंतु मानसिंगच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंहाने याचे कारण विचारले. यावर महाराणा प्रताप म्हणाले स्वतःच्या समशेरच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याऐवजी जे राजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्य रक्षण करतात, अशा अस्वाभिमानी राजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही. मी जर आपणासोबत जेवण केले तर बाप्पा रावळ, राणा संग, ह्या सारख्या थोर वंशाला काळीमा फासण्यासारखे होईल. हे ऐकून मानसिंहाच्या मनात खटकले आणि महाराणा प्रतापसिंह यांना धमकी देत म्हणाला महाराणा प्रतापसिंहजी आज आपण माझा अपमान केला ह्याचा बदला रणांगणात अवश्य घेईल व मानसिंह काय आहे हे दाखवून देईल. असे म्हणून तेथुन निघुन गेला आणि मानसिंह व महाराणा प्रतापसिंह यांच्यात कट्टर वैरत्व निर्माण झाले.
ही घटना अती शिगेला पोहोचली व युध्दात रूपांतर झाली. राणाजींचे वक्तव्य नेहमीच मानसिंहाच्या मनाला खटकत होते. ही संपूर्ण घटना मानसिंहाने अकबराला सांगितली. पहिलेच मानसिंह तिलमिला झालेला होता आणि अकबराला मेवाड पाहिजे होते. याकरीता अकबर सर्वत्र जहर घोळण्याचे काम करीत होता. अशा परिस्थितीत अकबराने मानसिंहाच्या नेतृत्वाखाली दोन लाख प्रचंड सैन्य आणि अकबराचा मुलगा सलीम याला घेऊन हल्दी घाटीच्या दिशेने महाराणा प्रताप यांच्याशी युद्ध करायला निघाला. ही बातमी महाराणा प्रतापसिंह यांना कळताच त्यांनी आपले बावीस हजार सैन्य घेऊन अरवली पर्वताच्या कुंभलगड वाटेने जाणाऱ्या मानसिंहाच्या सैन्यावर बाणांनी छुपे हल्ले करून बरेचसे सैनिक धाराशाही केले. दोन लाख सैन्याशी बावीस हजार सैन्य लढा देत होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या तलवारीचा वार अकबराचा मुलगा सलीमवर बसणार तितक्यात सलिमचा हत्ती हालला आणि तो तलवारीचा वार हत्तीवर बसला आणि सलिम वाचला. महाराणा प्रतापसिंहांच्या भितीने मानसिंह आपल्या सैन्यासह पिछाडीवर रहाला.
हे घनघोर युद्ध अनेक दिवस चालले. राणाजी आपल्या तलवारीने वेढा कापत सामोरं जाण्याचा प्रयत्न करू लागले. महाराणा प्रतापसिंह जखमी झालेले पाहून मानसिंह अत्यंत दु:खी झाला. आपण कुठेतरी चुकत आहोत हे त्यांच्या लक्षात आले व मेवाडच्या रक्षणासाठी आपण येथुन निघून जाण्यास विनंती केली व प्रतापसिंहानी ती मान्य केली. प्रतापांचे छत्र आणि मुकुट मानसिंहाने स्वतः डोक्यात घातले. मानसिंहाला महाराणा प्रतापसिंह समजून मोगलांनी आक्रमण केले. अनेक मोगलांना त्यांनी ठार मारले व शेवटी विरगतीरला प्राप्त झाले. तेवढ्यातच शत्रू सैनिकांनी राणाजींचा घोडा चेतक याच्या पायावर तीर सोडून वार केला. त्याचा पाय निकामी झाला. अशाही परिस्थितीत स्वामिनिष्ठ घोड्याने वेढ्याचा भेद करून व संपूर्ण वेढा चिरत दूर निघून गेला. वाटेत एक ओढा लागला चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि काही दुर जाऊन चेतकने प्राण सोडला.
आपला पाठलाग कोण करीत आहे हे पहाण्यासाठी राणाप्रतापांनी मागे फिरून पहिले, तर अकबराला जाऊन मिळालेला आपला धाकटा भाऊ शक्तीसिंह व त्यांच्या बरोबर चार-पाच मोगल सैनिकांना जिवे मारीत होता. राणाजी हे दृश्य पाहून अचंबित झाले. यानंतर शक्तीसिंह राणाजींजवळ आले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाला दादा तुझ्या सारखे शौर्य आणि कणखर मन यांच्या अभावामुळे मी जरी मोगलांची सरदारकी करीत असलो तरी तूच माझा आदर्श आहे. या हल्दी घाटीच्या युद्धानंतर अकबराने महाराणा प्रतापसिंह यांच्यावर अनेक आक्रमणे केली. मात्र अकबर महाराणा प्रतापसिंह यांना पराभूत करू शकला नाही.
हल्दीघाटी हे इतिहासातील सर्वात मोठे युद्ध मानल्या जाते. प्रतापांना हरविण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून अकबराने पराक्रमी योद्धा जगन्नाथला मोठ्या सेनेसह १५८४ मध्ये मेवाडवर आक्रमक करण्यास पाठविले. परंतु २ वर्षे अथक प्रयत्न करूनही तो महाराणा प्रतापसिंह यांना पकडू शकला नाही किंवा हरवू शकला नाही. अशाप्रकारे प्रबळ महत्त्वाकांक्षी, दृढनिश्चयी, धैर्यशील, उज्वल कीर्तीवंत आणि साहसी अशा महाराणा प्रतापसिंहाला शमविण्याचा प्रयत्न अकबराने केला पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. २१ जून १५७६ रोजी चेतकने (घोड्याने) महाराणा प्रतापसिंहांना निरोप दिला. आजही हल्दीघाटी येथील राजसमंद येथे चेतकची समाधी आहे. त्याकडे पहाणारे सर्वच प्रतापांच्या मूर्तीप्रमाणेच श्रध्देने पाहतात. १९ जानेवारी १५९७ रोजी महाराणा प्रतापसिंह यांची प्राणज्योत मावळली.
भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंहाचे नाव राष्ट्र, धर्म, संस्कृती, स्वाभिमान यासाठी आजही मानाने घेतले जाते. जोपर्यंत सुर्य-चंद्र, आकाश-पाताळ आहे तोपर्यंत प्रतापांचे नाव अमर राहील. परमप्रतापी महाराणा प्रतापसिंहांना जयंती निमित्त कोटी-कोटी प्रणाम! जय हिंद!
रमेश कृष्णराव लांजेवार
माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर
मो. ९९२१६९०७७९