जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
रेल्वे स्थानकावर अनेक दिवसांपासून भिक्षा मागणारी महिलांची टोळी पाहायला मिळते. ही टोळी भुसावळ, जळगाव, धरणगाव या मार्गाच्या रेल्वे प्रवासात जास्त करून आढळून येते. भिक्षा मागणाऱ्या महिला रेल्वेच्या बोगीत फिरून प्रवाशांकडून मोठ्या स्वरूपात पैसे मागत असतात. जर प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिला तर भिक्षा मागणाऱ्या त्या महिला प्रवाशांचे कपडे ओढून पैशांची मागणी करतात.
या भिक्षा मागणाऱ्या टोळीत लहान मुले- मुली हाताला खोटी मलम पट्टी बांधतात, त्यावर आयोडीन सारखा लेप लावून जखम स्वरूपात दाखवून हातात मेडिकलची खोटी पावती घेऊन भिक्षा मागून पैशांचा हट्ट करतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
या संदर्भात बऱ्याच वेळा बातम्या प्रकाशित करून देखील रेल्वे पोलीस कुठलीही दखल घेत नाही. याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. या टोळीवर फक्त तात्पुरती कारवाई पोलीस करतात. या कारवाईने त्या टोळीवर कुठलाही फरक पडत नाही. तर पुन्हा ही टोळी भिक्षा मागायला रेल्वे बोगीत सक्रिय होतात.
या टोळीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच सध्या रेल्वेमध्ये चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणून या टोळीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.