धक्कादायक : मधमाशांच्या हल्ल्यात गुरे चारण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

0

धरणगाव :- तालुक्यातील नांदेड येथे शेत शिवाराकडे गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुकदेव धनसिंग कोळी (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवार ६ रोजी घडली. तापी नदीकाठालगतच्या शेतशिवाराकडे सुकदेव कोळी हा गुरुवारी गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी गुरे चरत असताना अचानक आगेमोहळाच्या मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मधमाश्यांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यासह हातापायांवर कडाडून चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो तेथेच पडून होता.सायंकाळी तो घरी न परतल्याने त्याचे नातलग व घराजवळील काही लोक शोध घेण्यासाठी गेले.

तो अत्यवस्थ स्थितीत तेथेच पडून असल्याने दिसून आले. घरी आणून त्याच्यावर खासगी डॉक्टरांद्वारे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा रात्री मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पवार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.