पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास निघालेल्या कोटा (राजस्थान) येथील एका २५ वर्षीय युवतीची रेल्वे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोटा (राजस्थान) येथील रहिवाशी तसेच फरिदाबाद येथे खाजगी कंपनीत नोकरीला असलेली वाघिषा संजय पोतेदार (Vaghisha Sanjay Potedar) (वय २५) ह्या दि. २० जुलै रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेसने (क्रमांक – १२६३०) डब्बा नंबर बी – ५ सिट क्रंमाक – १ वरुन पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती.
दरम्यान बुऱ्हाणपूर ते भुसावळ दरम्यान वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. एक्स्प्रेस ही भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. वाघिषा हिला अस्वस्थ वाटु लागल्याने तिने तिच्या जवळ असलेली मेडिसिन घेतली. मात्र जळगांव ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान वाघिषा हिची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान दि. २१ जुलै रोजी पहाटे ३ वाजुन ३० वाजता संपर्क क्रांती एक्स्प्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. घटनेची माहिती पाचोरा काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळताच सचिन सोमवंशी हे तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले.
वाघिषा हिला लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा चे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार, आर. पी. एफ. पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र वाघिषा हिची प्राणज्योत मालवली होती. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ वाघिषा हिच्या परिवारास घटनेची माहिती कळविल्यानंतर वाघिषा हिचे वडिल, आई हे पुण्याहुन पाचोरा येथे दाखल झाले असता त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चाळीसगाव चे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.
आपल्या चुलत बहिणीच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी वाघिषा पोतेदार ही युवती एकटीच दिल्लीहुन पुणे येथे संपर्क क्रांती एक्स्प्रेसने निघाली होती. दरम्यान बुऱ्हाणपूर ते भुसावळ रेल्वे स्थानकादरम्यान वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. भुसावळ रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस दाखल झाली असता रेल्वेचे डाॅक्टरांनी वाघिषा हिस रुग्णालयात दाखल करुन न घेता मेडिसीन देवुन पुढील प्रवासासाठी रवाना केले. याच वेळी जर वाघिषा हिस रेल्वेच्या डाॅक्टरांनी भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले असते तर कदाचित वाघिषा हिचे प्राण वाचु शकले असते.