कैद्याच्या मृत्यूप्रकरणी तुरूंग अधिक्षकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळच्या दुय्यम कारागृहात झालेल्या मारहाणीत मुक्ताईनगर तालुक्यातील कैद्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तत्कालीन तुरूंग अधीक्षकांसह चार तुरूंग रक्षकांवर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील सुनील भागवत तारू ( वय ४०) यांना मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानुसार २९ फेब्रुवारी २०२० रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तारू यांना भुसावळ दुय्यम कारागृहात हलवण्यात आले होते. येथे त्यांना तुरूंग अधिक्षक आणि तुरूंग रक्षकांनी मारहाण केली होती.

या मारहाणीमुळे सुनील चारू यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. यानंतर सुनील तारू यांना न्यायालयात दाखल करण्यात आले होते. येथे ४ मार्च २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी मयताची पत्नी मंगला सुनील तारू (वय ३५, रा. चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांनी भुसावळ शहर पोलिसात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन तुरूंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, तुरूंग रक्षक व हवालदार सुभाष बाबूराव खरे, हवालदार भानुदास निवृत्ती पोटे, सीताराम विठ्ठल कदम आणि अनिल श्रीराम बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पडघन करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.