जळगाव : गिरीश महाजनांनी पाप-पुण्याबाबत बोलू नये, लोकांनी तुम्हाला संकटमोचक म्हटले असले, तरी देव म्हटलेले नाही, अशा शब्दात भाजपची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजनांवर टीका केली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाजन असा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी उन्मेष पाटील इच्छुक होते. मात्र भाजपने पाटलांचा पत्ता कट करत ऐनवेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी नाकारल्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले आणि त्यांनी थेट ठाकरे गटाची वाट धरली. पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत सहभागी झाल्यापासून जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अशातच आता जळगावमध्ये भाजपला 5 लाखांच लीड मिळेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना उन्मेष पाटील म्हणाले, भाजपकडून अबकी बार 5 लाख पार म्हंटले जात आहे. पण आम्ही अबकी बार करण पवार म्हणतो आहे. भाजप फक्त डोकी मोजते आहे. पण लोकांच्या मनातील विचार मोजतोय. आमच्याबरोबर शेतकरी आणि तरुणवर्ग आहे, असे म्हणत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
तुम्हाला देव म्हटलेले नाही
‘ज्यांचे पुण्य संपत ते लोक भाजपमधून बाहेर जातात,’ अशी टीका महाजन यांनी केली होती. यावर बोलताना पाटील म्हणाले, “तुम्हाला लोकांनी संकटमोचक म्हटले असले, तरी तुम्हाला देव म्हटलेले नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांनी पाप पुण्याबाबत बोलू नये तो हिशेब जनता करेल.” असा टोला त्यांनी हल्ला केला.