भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळमध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली असून एका रात्रीत तीन निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून तलवार व चाकूने भोसकून दोघा सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे (वय 33) व राकेश भोलानाथ साळुंखे (वय 28) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरु होत नाही तोच मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा देखील मर्डर झाला. एकाच रात्री तीन मर्डर झाल्याने जिल्हात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जुन्या वादाची किनार
शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे हे कंडारी गावातील असून या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद होता. या वादातून हल्लेखोरांनी भावंडांवर तलवारीसह चाकूचा सपासप वार केल्याने दोन्ही भावंड जागीच मृत झाले. तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाला असून त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा खून
कुविख्यात गुन्हेगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या निखील राजपूतची देखील हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. भुसावळ शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. 24 तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधिकारी दाखल
दरम्यान खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला असून तो शवविच्छेदनासाठी हलवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.तर कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे व मनोज मोरे यांची नावे कळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.