पुणे – लोकशाही न्युज नेटवर्क –
शरद पवार यांचा पराभव करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे, हे चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. त्यांची चूक झाली, हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही बारामतीत येऊ नका, आम्ही पाहतो. त्यानंतर ते चूप आहेत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार निवडणुकीलाच उभे नाहीत मग त्यांचा पराभव कसा होईल, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीला उभ्या आहेत, पराभव होणार तो त्या दोघींपैकी एकीचा, असंही अजित पवार म्हणाले.
पक्ष सोडलेल्यांना नो एन्ट्रीबाबत अजित पवार यांनी उलटा प्रश्न केला, की नीलेश लंके यांना परत घेतले नाही का? हे फक्त बोलण्यासाठी असतं. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो असेही ते म्हणाले.
भाजपबरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार किमान आता मान्य करत आहेत. सहा-सहा मीटिंग झाल्या भाजपसोबत. जायचे नव्हते तर मीटिंग का झाल्या? असा सवाल अजित पवारांनी विचारला. काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, की कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अशी विधानं करतात. शरद पवार फक्त त्यांना जे वाटतं तेच ते करतात. मला वाटत नाही उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असंही अजित पवार म्हणाले.