पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर पोहचले यान ; पंतप्रधानांकडून कौतुक
श्रीहरीकोटा ;- चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. असून इस्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज पॉइंट म्हणजे L1 च्या जवळपास हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केलं आहे. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशनची आखणी केली आहे. L1 पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर एक टक्क्यावर येतं. इस्रोने मागच्यावर्षी 2 सप्टेंबरला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य सोलर ऑब्जर्वेटरीला सूर्याच्या दिशेने पाठवलेलं. हि भारताची सूर्याजवळची ही एक वेधशाळाच आहे.
इस्रोच्या पीएसएलवी-सी57 रॉकेटने २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य-एल1 च यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आदित्य एल 1 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेलं. फक्त सूर्याचा अभ्यास आणि प्रत्येक छोट्यात छोट्या घडामोडीची माहिती देणं हाच ‘आदित्य एल1’ मिशनचा उद्देश आहे. सौर वातावरण, सूर्याची ऊर्जा, सूर्याचा पृष्ठभाग, सूर्यावर येणारे भूकंप हे उद्देश या मिशनमधून साध्य करण्यात येतील.
या य़शस्वी मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करतांना म्हटले की, भारताने आणखी एक लँण्डमार्क निर्माण केला आहे. भारतातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 गंतव्यस्थानावर पोहोचली. आमच्या शास्त्रज्ञांच्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्याच्या अथक समर्पणाचा हा पुरावा आहे. या विलक्षण पराक्रमाचे कौतुक करण्यात मी राष्ट्रासोबत सामील होतो. आम्ही मानवतेच्या हितासाठी विज्ञानाच्या नवीन सीमांचा पाठपुरावा करत राहू.
इस्रोला सौर क्रियाकलापांचा अभ्यास करायचा आहे जे सूर्याच्या पृष्ठभागावरुन बाहेर पडतात आणि अवकाशात पसरतात आणि काहीवेळा पृथ्वीच्या दिशेने देखील येतात, जसे की कोरोनल मास इजेक्शन, सोलर फ्लेअर्स, सौर वादळे. म्हणून, लॅग्रेंज पॉइंट 1 (L-1) या संदर्भात एक विशेष स्थान आहे, कारण कोरोनल मास इजेक्शन आणि सूर्यापासून निघणारी सौर वादळे या मार्गाने पृथ्वीकडे जातात. L1, L2 आणि L3 या तीन पाॅईंटची जागा निश्चित नसते. तर L4 आणि L5 स्थिर आहेत आणि त्यांची स्थिती बदलत नाही. L3 बिंदू सूर्याच्या मागे आहे. L1 आणि L2 बिंदू थेट सूर्यासमोर आहे. त्यामुळे संशोधनाच्या दृष्टीकोनातूनही L-1 हा बिंदू अतिशय योग्य मानला जातो, कारण तो पृथ्वीच्या जवळ आहे आणि येथून दळणवळण खूप सोपे आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पाच लॅग्रेंज बिंदू आहेत. या टप्प्यावर अवकाशयानाचे गुरुत्वाकर्षण केंद्राभिमुख बलाच्या बरोबरीचे होते. त्यामुळे कोणतेही वाहन येथे दीर्घकाळ थांबून संशोधन करू शकते.