जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क
शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने समता पर्व आयोजित करण्यात आले आहे. ज्या अंतर्गत आज १५ तास अभ्यासाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. सदर पेसमेकर या संस्थेचे नाना अहिरे यांनी विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्य उपलब्ध करून दिले जे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना वाटण्यात आले. ज्याचे सलग वाचन १५ तासांमध्ये करण्यात येणार असून त्याचा समारोप रात्री अकरा वाजता मशाल यात्रेने होणार आहे. ही मशाल यात्रा रात्री अकरा वाजता मू.जे.महाविद्यालयांमधून सुरू होऊन रेल्वे स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून या अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. या अंतर्गत महाविद्यालयातील १६० विद्यार्थी आणि १० प्राध्यापक सहभागी झाले होते. समता पर्व हे अभियान ११ एप्रिल ला आरंभ करण्यात आले.
११ तारखेला ज्योतिबा फुले जयंती अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यात प्रा.के.एल.हिरोळे यांनी व्याख्यान दिले. तसेच १२ तारखेला महाविद्यालयात परिवर्तनाच्या कविता आणि गाणी हा उपक्रम घेऊन यामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी समता, न्याय, बंधुता आणि परिवर्तन या विषयाशी निगडित विविध कविता आणि गाणी सादर केलीत. 13 तारखेला १५ तास सतत अभ्यास उपक्रमात सहभागी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी काही रक्कम जमा करून विद्यार्थ्यांच्या भोजनाची आणि इतर साहित्य खरेदीची व्यवस्था केली होती. तसेच १४ तारखेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन आणि कार्यावर परीक्षा घेण्यात येणार असून विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे.