भडगाव :- प्रतिनिधी
नाचणखेडा- भडगाव रस्ता तात्काळ मंजूर करून नव्याने करण्यात यावा या मागणीसाठी आज तहसीलदार माधुरी आंधळे व आमदार किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी नरेंद्र पाटील, शेख शकील शेख बाबू सुभाष ठाकरे, रमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शब्बीर बेग मिर्झा, नंदू चौधरी , आत्माराम महाजन, श्याम चौधरी, राजेंद्र चौधरी, वसंत पाटील, नामदेव महाजन, शांताराम माळी, अनिल पाटील, नामदेव महाजन, विनोद आचारी, अहमद मिर्झा, धोंडू सुका पाटील, काशिनाथ आचारी आदी शेतकरी उपस्थित होते.
नाचणखेडा ते भडगाव या दोन गावांना जोडणारा हा दोन तालुक्यातील रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे हाल झाले आहे. रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरला आहे. चिखल झाला आहे. रस्त्यावर येण्या-जाण्यासाठी जागा नसून वाहने मध्येच सोडावी लागत आहे . गाडे बैल आणि सरळ चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातच सोडावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांचा शेतात काढलेला मका, उडीद, चवळी जेमतेम पावसापासून वाचली होती. ती घरी आणण्यासाठी शेतात एकत्र जमा करून ठेवण्यात आली मात्र रिक्षा रस्त्यात आडल्याने व गाढबैल ही शेतापर्यंत येत नसल्याने या शेतकऱ्यांचा माल शेतातच सडून खराब झाला. अशी अनेक उदाहरणे या भागात पाहायला मिळत असून शेतकरी संतप्त झाले आहेत. यावेेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाविषयी नाराजी व्यक्त केली.
शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व नाचणखेडा भडगाव रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, शेतकऱ्यांचे हे गंभीर प्रश्न तात्काळ सोडवावे अशी मागणी यावेळी नरेंद्र पाटील, काशिनाथ आचारी, राजू शेख, सुभाष ठाकरे, आदी शेतकऱ्यांनी केली . भेटीदरम्यान तहसीलदार माधुरी आंधळे यांनी पंचनामे करणार असल्याचे सांगितले. तर रस्त्याचे काम लवकरच मंजूर करू असे आश्वासन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिले .