गडचिरोली । लॉकडाऊनमुळे राज्यात सलून व पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच सलून व पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, व्यवसाय बुडाल्याने राज्यभरातील नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व सलून व पार्लर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात येत्या आठवडाभरात सरकार निर्णय घेणार आहे. परंतु सलून सुरु झाल्यानंतर सामाजिक अंतर व अन्य अटींचे पालन करावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले
याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानंतर रेड झोन सोडून उर्वरित भागात आंतर जिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबतच सरकार विचार करीत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. याचसोबत मंगल कार्यालयात ५० वऱ्हाडी व ५ वाजंत्री यांच्या उपस्थितीत लग्न लावता येणार आहे. मात्र, मंगल कार्यालयात वातानुकुलीत यंत्रणा बंद करावी लागेल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.