भुसावळ (प्रतिनिधी)- शहरात पाच तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी दोन कोव्हिड सेंटर तयार करण्यात आलेले आहे. भुसावळातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्ह्याधिकारी डाॅ.अविनाश ढाकणे यांनी प्रांत कार्यालयात कोरोना रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील यासाठी आज दि.२ जुन मंगळवार रोजी बैठक घेतली.
भुसावळातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८५ इतकी झाली आहे.मयत रुग्णांची संख्या २४ वर पोहचली आहे. ही संख्या कशी कमी करता येईल यासाठी शहरातील खाजगी डॉक्टर,नगरपरिषदेचे डॉक्टर, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महसूल कर्मचारी तसेच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतली.
कोरोना प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यासाठी सूचना दिल्या तसेच बैठकीत आलेल्यांकडून काय उपाय योजना करता येतील याची माहिती जाणून घेतली. ती माहिती लवकरच अंमलात आणली जाईल असेही आश्वासन दिले.
कोव्हिड सेंटरला रुग्णांना पिण्याचे पाणी तसेच जेवणाची व्यवस्था वेळेवर केली जात नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.ज्या भागात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले त्या परिसराला १२ तासात सील करण्यात यावे आधी ५ किलोमीटर,३किलोमीटर अशा प्रकारे परिसर सील करण्यात येत होते. आता ज्या भागात रुग्ण बाधित आढळून आला त्या भागातील गल्लीला किंवा इमारतीला सील करण्यात येत आहे.त्या घरातील व्यक्तींना कॉरंटाईन करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे मोठे घर असल्यास तो व्यक्ती त्या ठिकाणी कॉरंटाईन होऊ शकतो असे शासनाने परिपत्रक काढले आहे.यासाठी नोडल अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर केव्हिड सेंटरला लावण्याच्या सूचनाही दिल्या पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले.जर सूचनांचे पालन होत नसेल तर गय केली जाणार नसुन कठोर कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती दिली.तसेच बाजार नेहमी प्रमाणे सुरू करण्यात आला असून खरेदी करण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे.तोंडाला मास्क,सोशल डिस्टनसींग,सॅनिटायझर असे कुठलेही वापर न करता फिरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याला थांबविण्यासाठी आपणच काळजी घेणे गरजेचे आहे.शहरात बिना मास्क फिरत असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.मेडिकल व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.पान दुकाने बंद ठेवण्यात आले आहे. वातानुकूलित मॉल तसेच किराणा शॉपी यामध्ये पाचपेक्षा जास्त कर्मचारी व ग्राहकाची ये-जा असेल अशांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.चहा, सलून दुकानांनाही बंद ठेवण्यात आले असून पर्यायी व्यवसाय करण्याचे सांगण्यात आले आहे.
सर्व पक्षीय बैठकीत आ. संजय सावकारे यांनी शहरातील दुकाने एक दिवस कापड दुकान,दुसऱ्या दिवशी किराणा दुकान असे दिवस रोटेशन ठरवून सुरू ठेवण्याच्या पॅटर्न भुसावळकरांनी अंमलात आणली पाहिजे.तर माजी आमदार संतोष चौधरी यांनी शहराची दोन भागात विभागणी करण्याचे सांगितले. सील करण्यात आलेल्या भागामध्ये प्रशासनाव्दारे पुरवठा करण्यात यावा.त्या भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मागणी प्रमाणे पूर्ण चार ते पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मोबाईल नंबर देण्यात यावा.नगराध्यक्ष रमण भोळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
शेवटी भुसावळकरांना सर्वात मोठा प्रश्न भेळसावणार तो पाण्याचा असून शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे यांनी केला.लवकरच भुसावळातील जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.