मुंबई : सध्या सोशल मीडियावर 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे रद्द केल्याचं वृत्त मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातंय. ब्रेकिंग स्वरुपातील हा बातमीचा व्हिडीओ आत्ताचा असल्याचा दावा करत शेअर केला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये काळजीचं वातावरण तयार होत होतं. मात्र, भारत सरकारच्या माहिती संचालनालयाने आणि रेल्वे विभागाने हे वृत्त चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच संबंधित व्हिडीओ हे यावर्षीचे नसून मागील वर्षीचे असल्याचं नमूद केलंय .
पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “एका बातमीत दावा करण्यात येत आहे की 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, ही बातमी जुनी आहे. भारतीय रेल्वे विभागाने 31 मार्च 2021 पर्यंतच्या ट्रेन रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जुनीच बातमी वेगळ्या संदर्भाने शेअर केली जात आहे.”
सोशल मीडियावर चुकीचे व्हिडीओ शेअर
रेल्वे मंत्रालयाने देखील हे वृत्त चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलंय. रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय, “सोशल मीडियावर चुकीचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. सर्वांना कळवण्यात येते की शेअर करण्यात येत असलेला व्हिडीओ मागील वर्षीचा आहे. तो व्हिडीओ आत्ताचा म्हणून शेअर केला जातोय.” “नियोजित एक्स्प्रेस आणि इतर रेल्वे विशेष रेल्वेंप्रमाणेच धावतील. सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवासादरम्यान कोरोनाचे सर्व नियम पाळावेत,” असंही आवाहन रेल्वे विभागाने केलंय.