जळगाव, (प्रतिनिधी)- महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला 4 दिवस शिल्लक असतानाच जळगावात राजकीय भूकंपाचं चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 27 हून अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, यावर बोलताना भाजपा नेते माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी हा ‘घोडेबाजार’ सुरु असल्याचा आरोप केला.
तसेच जे गेले आहेत ते परत येतील… पक्षा विरोधात काम केल्यास सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई अटळ आहे, असेही ते म्हणाले आहे. सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नाही असा आरोप देखील होत आहे याबाबत स्पष्टीकरण देतांना आ. महाजन म्हणाले की विकासाचा मुद्दा नाहीच…आता अंडरग्राउंड ड्रेनेज झालेले आहे, पाणी पुरवठा योजना,100 कोटींच्या कामांची वर्क ऑर्डर झाली असून पुढील आठ पंधरा दिवसात कामे सुरु होतील त्यामुळे हा काही विषय नाही.
भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यावर काही नगरसेवकांची नाराजी असल्याबाबत बोललं जात आहे या बाबत विचारलं असता आ. महाजन यांनी म्हटले की होय… काही लोकांची नाराजी असू शकते… सर्वांचेच समाधान नाही होऊ शकत.. नाराजी चालूच असते मग राजुमामा बद्दल असो किंवा माझ्याबद्दल… तिथे राजूमामा उभे नाहीत, पक्ष उभा आहे.