नवी दिल्ली :देशातील कोरोनाने एक भयानक रूप धारण केले आहे. जगातील सर्वात वेगवान संसर्ग भारतात पसरत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी देशात जगातील आतापर्यंतचे विक्रमी 86,432 नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर 1,089 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता कोरोनाची लागण होणारी एकूण संख्या 40 लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे.
केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे गेल्या 24 तासांत 86 हजार 432 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 089 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 69,561 वर पोहोचला आहे.दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यत ३१ लाख ७ हजार २२३ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या 8 लाख 46 हजार 395 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सलग आठ दिवस दररोज ६० हजारांहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. ०.५ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रांवर ठेवण्यात आले आहे. ३.५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मृत्युदर १.७४ टक्के आहे. सलग दुसऱ्या दिवशी ११.७० लाखांहून अधिक नमुना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढत असले तरी दैनंदिन संसर्गदर ७.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.