मुंबई | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. आता संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी एका उच्चशिक्षित महिलेने त्यांच्या विरुद्ध छळवणूकीसह गंभीर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.त्यामध्ये, आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर या महिलेने . ‘२०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन २०१८मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता; मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही,’ असे या महिलेने याचिकेत म्हटले आहे.
मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. अखेर आयोगाने एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, तरीही बीकेसी-परिमंडळ ८च्या पोलिस उपायुक्तांनी त्याची आजतागायत दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे,’ अशी कैफियतही या महिलेने याचिकेत मांडली आहे.