श्रीनगर: कलम ३७० रद्द केल्यापासून दहशतवाद्यांच्या कुरापतीत दिवसेंदिवस वाढत असून देशात हल्ला करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलास सतर्कतेचे आदेश यंत्रणेकडून देण्यात आले आहेत.
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरातील दुकानदारांना घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे त्यामुळे सुरक्षा दलाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच राज्यातील जनतेला हे दहशतवादी भडकावण्याचे काम करणार नाहीत याची काळजी सुरक्षा दल घेणार आहे त्यासाठी सुरक्षा दलास सतर्क राहण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे पोलिस प्रमुख दिलबाग सिंह यांनी राज्यात दहशतवादी दिसल्याची बातमी फेटाळता येत नाही परंतू, ते उघडपणे राज्यात फिरतात ही अतिशयोक्ती असल्याचे म्हटले आहे.