मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात यंदा पाऊसपाणी चांगले झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असताना, शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट उभे ठाकले आहे. कृषिपंपांना करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत महावितरणकडून मोठा निर्णय घेतलाय. आतापर्यंत महावितरणकडून कृषिपंपासाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावर त्यात बदल करण्यात आला आहे. आता शेतीसाठी केवळ 8 तासच वीजपुरवठा केला जाणार आहे. 1 नोव्हेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे..
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रात वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पीक क्षेत्र वाढले, तर कृषीपंपाचा वापरही वाढणार आहे. मात्र, वीजपुरवठ्यात कपात केल्याने पाणीसाठा असतानाही शेतकऱ्यांना ते पिकांना देता येणार नाही. महावितरणकडून दरवर्षी रब्बी हंगामात हा निर्णय घेतला जातो. खरीप हंगामात पाऊस सुरु असतो. त्यामुळे पिकांना पाणी देण्याची गरज पडत नाही. मात्र, रब्बीतील पिके पाणीसाठ्यावरच घ्यावी लागतात. त्यात 8 तासच वीजपुरवठा होणार असल्याने पिकांना पाणी देताना, शेतकऱ्यांची ओढाताण होणार आहे.महावितरणच्या वीज कपात करण्याच्या निर्णयामागे कोळसा टंचाईचे कारण सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून कोळसा टंचाई जाणवत असल्याने वीजनिर्मितीला खीळ बसली आहे. आता किमान 8 तास तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.