राष्ट्रवादीचे संस्थापक खा.शरद पवार यांची जोरदार टीका
सीबीआय व इडीचा जाणीवपुर्वक वापर, उद्धव ठाकची उडविली खिल्ली,
मुक्तार्इनगरची तडजोड जाणीवपुर्वक, खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती नव्हते,
जळगाव (प्रतिनिधी)- पूर्वी राज्याच्या बैठकीत विकासाला अग्रक्रम देणारा जिल्हा म्हणून जळगाव विकास पॅटर्न राबविण्याचा आग्रह असायचा. मात्र गेल्या काही वर्षात सत्तांतरानंतर त्यात सातत्य राखण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले असून जिल्ह्याचा विकासाचा पॅटर्न उद्ध्वस्त झाल्याची जोरदार टीका खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
खा. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बुधवारी सकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह माजी मंत्री दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील, जळगाव शहरचे उमेदवार अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.
स्व. मधुकरराव चौधरी, के.एम. बापू पाटील यांच्या कार्यकाळात प्रगत जिल्ह्यात जळगावचा उल्लेख असायचा आता दुर्लक्षित जिल्ह्यात जळगावचा नंबर लागत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे रस्ता बांधणीचे काम होते. ते जळगावचे पालकमंत्री असतानाही रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. जिल्हा शेतीप्रधान असूनही पाण्याची योग्य तरतूद नाही. नारपार, मेघा रिचार्ज याबाबत योग्य तरतूद नाही. पाटबंधाऱ्यांच्या कामांना गती नाही. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी देशात व देशाबाहेर जाण्यासाठी स्पेशल वॅगन व्यवस्था होती. आता मात्र केळी उत्पादक शेतकऱ्याची डोकेदुखी वाढली आहे.
सीबीआय व इडीचा जाणीवपुर्वक वापर
अडसर ठरणाऱ्या व्यक्तींना अडचणीत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सीबीआय व इडीचा राज्यात जाणीवपुर्वक वापर सुरु केला असल्याची टीका त्यांनी केली.
आकड्यात रस नाही
आघाडीच्या राज्यात 40 जागाही येणार नाहीत या ना. गिरीश महाजन यांच्या वक्तव्याबाबत बोलताना मी ज्योतिषी नाही मला जागांचा अभ्यास नाही व आकड्यातही रस नसल्याची त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकची उडविली खिल्ली
सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु या उद्धव ठाकरे यांच्या विधानाची खिल्ली उडवत पाच वर्षे सत्तेत असताना काय केले? असा मिश्किल सवाल त्यांनी विचारला.
मुक्तार्इनगरातील तडजोड जाणीवपुर्वक
मुक्तार्इनगरचा अभ्यास केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांना थांबविण्याचा निर्णय राज्यपातळीवरुन घेतला. मुक्तार्इनगरातील भाजप सेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत करुन केलेली तडजोड ही जाणीवपुर्वक असल्याचे त्यांनी सांगितले.
खडसेंच्या प्रवेशाबाबत माहित नाही
आ. एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. तर अजित पवारांनी म्हटले असल्यास त्यांना विचारावे लागेल असा मिश्किल टोला त्यांनी दिला. तसेच इडीबाबत इतरांप्रमाणे खडसेंनीही आपली बाजू घेतली असल्याचे ते म्हणाले.