सोलापूर : वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायद्याविरुध्द आज शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. चेंबूर, सोलापूर येथे बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, एमआयएम, माकपसह जिल्ह्यातील १५० संघटनांनी पाठिंबा दिला. बार्शीतील शिवसेनेचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. कोल्हापुरात बंदचा काहीच परिणाम नाही नसून जनजीवन सुरळीत आहे. मुंबईतील सायन-ट्रोम्बे रोड येथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आल्या आहे. कर्जत शहरात बंदला प्रतिसाद मिळत असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.