भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव रेल्वे स्थानकावर कामायनी आणि सचखंड एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी भाजपच्या वतीने 25 फेब्रुवारी 2014 साली चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर दुपारी 12 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर कार्यकर्त्यांसह खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल आठ वर्ष चाललेल्या खटल्यानंतर आंदोलकांसह खासदारांची भुसावळ रेल्वे न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
भाजपच्या वतीने 25 फेब्रुवारी 2014 साली चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर दुपारी 12 वाजता सुमारे दोन तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात भाजपचे तत्कालीन पदाधिकारी उन्मेश पाटील, तत्कालीन तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, तत्कालीन शहराध्यक्ष नगरसेवक राजु अण्णा चौधरी, उद्धवराव माळी, नगरसेवक संजय घोडेस्वार, जि.प.चे माजी सभापती राजेंद्र राठोड, घृष्णेश्वर पाटील, शरद चौधरी, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यात शुक्रवारी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह सर्वांची भुसावळ रेल्वे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आठ वर्षांपासून जनतेसाठी केलेला लढा रेल्वे कोर्टात सुरू होता व शुक्रवारी या गुन्ह्यातून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खासदारांतर्फे अॅड.आर.एम.यादव (भुसावळ), अॅड.वैशाली साळवे (भुसावळ) यांनी कामकाज पाहिले.
निकालप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. जनतेच्या सेवेसाठी केलेला लढा यशस्वी झाल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.