मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, गर्दीमुळे हा व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल या त्यादृष्टीनं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय या दोन्ही रेल्वे प्रशासनानं घेतला असून प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्यात आलं आहे. फलाटावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे तो टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल पाच पटीने वाढवण्यात आलं आहे.
राज्य सरकारनं गर्दी टाळण्यासाठी प्रमुख प्रार्थनास्थळं दर्शनासाठी बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार, अनेक मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता गर्दी कमी करण्यासाठी मोठमोठ्या रेल्वे स्थानकांसाठी हा निर्णय घेतला आहे. यात मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरुन 50 रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, लोकांनी अधिक एकत्र एका ठिकाणी जमू नये, जेणेकरून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे, बस आणि मेट्रोसेवा तब्बल 7 दिवस बंद ठेवण्याचा विचार आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.