जळगाव : देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील चार दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 17 ते 22 मार्चदरम्यान औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात बदलणारे हे वातावरण कोरोना व्हायरससाठी पोषक असल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, मालेगाव, कोल्हापूर हे जिल्हे वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमानात 6 अंशांपर्यंत घट होऊन वातावरणात गारवा जाणवेल. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकला, दमा आदी रोगांचा उपद्रव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.