मुंबई : मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचं ई-भूमिपूजन करण्याचा केंद्र सरकारला सल्ला दिलेला असतानाच याच मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. राम मंदिराचं भूमिपूजन व्हावं. पण भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही, असं सांगतानाच करोनाचं संकट असताना भूमिपूजनासाठी हीच वेळ का निवडली?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राम जन्मभूमिच्या भूमिपूजनावर सुरू असलेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. राम मंदिराचं भूमिपूजन व्हायलाच हवं. मंदिराचं भूमिपूजन होत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. पण भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवं. पण सध्या करोनाचं संकट आहे. त्यामुळे आता भूमिपूजन करणं योग्य नाही. भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही. ही वेळ का निवडली हेच कळत नाही, असं राज म्हणाले.
करोनाचं संकट आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हे संकट गेलं असतं तर दोन महिन्यानंतरही भूमिपूजन करता आलं असतं. जगण्याची हमी आली असती तर लोकांनीही या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला असता, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ई-भूमिपूजन करण्याचा दिलेल्या सल्ल्याशी असहमती दर्शवली. एवढ्या संघर्षानंतर राम मंदिर होत आहे. या मंदिरासाठी असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. असा ऐतिहासिक सोहळा हा धुमधडाक्यातच व्हायला हवा. करोनाचं संकट आहे म्हणून त्यावर ई-भूमिपूजन होऊ शकत नाही. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको. त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.