लोकशाही, न्यूज नेटवर्क
काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने शासनाकडून निर्बंध शिथील करण्याचे संकेत मिळाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी सांगितल्यानुसार जळगावसह २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध असणार आहेत . संध्याकाळी राज्य सरकारकडून अधिकृतपणे आदेश काढण्यात आला आहे. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्यांचे जास्त लक्ष लागलेले होते.
यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. कारण, ज्या भागात सध्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी ही देखील माहिती आज दुपारी दिली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण कमी होताय तिथल्या नागरिकांसाठी हा दिलासा असणार आहे. या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. तर, रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानंच उघडी असणार आहेत.
अशी असेल नवी नियमावली..
– सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.
– सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी
– सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी, फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
– जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
– कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पुर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी
– जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी.
– जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद.
तर पुणे, सताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.