मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजयातील मंदिरं सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची मनापासूनची इच्छा असून ते लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. राऊत यांनी ही प्रतिक्रिया देऊन तासभरही उलटला नाही तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याबाबत विधान केलं आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं उघडण्याच्या विनंत्या येत आहेत. मात्र, त्याविषयी सावधानता बाळगावी लागणारच आहे, असं मोघम उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथीळ कोविड उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी मंदिरांचा उल्लेख करून त्यावर थेट भाष्य न केल्याने तूर्तास तरी राज्यातील मंदिरं सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिकस्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, अशी असं सांगून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य करणं यावेळी टाळलं.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिराचं आंदोलन केल्यानंतर आठ दिवसात मंदिरं सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं सांगितलं होतं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मंदिरं सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आजच ठाकरे सरकारला पत्र लिहून दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर सुरू करण्याबाबत कोणतंही थेट भाष्य न केल्यानं राज्यातील मंदिरं (temple) सुरू होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. त्यामुळे विरोधक आता काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.