मुंबई । मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये, असे त्यांनी खडसावले. अनेक मंदिरं आणि देवस्थानांनी कोविडशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. याशिवाय औरंगाबाद, पंढरपूरमध्ये झालेल्या आंदोलनात नियमांचा फज्जा उडाल्याचे ते म्हणाले. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मुंबईत काल कोरोना रुग्णांचा अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन अधिकचे संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणे महत्वाचे आहे. घाई करुन चालणार नाही, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.
विरोधकांना सरकारकडे मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवले पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घ्या. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचे आहे, हे माहिती असतानाही विरोध असे वागत असतील तर हे जनतेच्या हिताचे नाही, असे ते म्हणाले