मुंबई : महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या दुसर्या लाटेची तीव्रता पाहता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय २० एप्रिल रोजी घेण्यात आला होता. त्याचा शासन निर्णय आज (ता.१२ मे) रोजी निघाला. त्यात दहावीची परीक्षा रद्द केल्याने गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल उल्लेख केला आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा संकेतांक क्रमाक 202105121221417621 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10 वीची परीक्षा आयोजित करण्यात येते. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मे 2021 मध्ये ही परीक्षा आयोजित करण्याचे प्रस्तावित होते.
मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असामान्य अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याविषयी चर्चा झाली होती. त्यानुसार आता शासनाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीची परीक्षा रद्द केल्याने गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्याबाबत तसंच 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल स्वतंत्रपणे निर्देश देण्यात येतील असंही शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
आता याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या राज्यात वाढत होती जी आता काहीशी नियंत्रणात येताना दिसते आहे. मात्र कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. त्यामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. याआधी 5 वी 9 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा असं स्पष्ट करण्यात आलं. आता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.