मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथ घेणार अाहेत. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं.
‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. मात्र एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चं संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. आता कार्यकारी संपादक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘सामना’चे संपादक असतील. सडेतोड टीकेपासून स्तुतिसुमनांपर्यंत विविधांगी अग्रलेख ‘सामना’त वाचायला मिळतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना ‘सामनाचे संस्थापक संपादक’ असं पद बहाल केलं.